बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील पुढील राजकीय भूमिकांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः पार्थ पवार यांच्या राजकीय भविष्याबाबत पक्षांतर्गत चर्चा वेग घेत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या; मात्र उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली असून, त्या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत जुलै 2028 पर्यंत होती, मात्र त्या उर्वरित कालावधीच्या जागेवर न जाता पार्थ पवार यांना पूर्ण सहा वर्षांच्या कार्यकाळाच्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू आहे. यासाठी पक्षांतर्गत हालचाली वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार यांच्या पश्चात पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी यापूर्वीच सक्रिय सहभाग घेतला होता. आता सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील, तर जय पवार हे दिल्लीत पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 2019 मध्ये पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.
शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मंगळवारी दिल्लीत जाणार होते; मात्र त्याआधी त्यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारस्थळी भेट दिली. तेथे त्यांनी नियोजित स्मृतीस्थळाबाबत विश्वस्त किरण गुजर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले, मात्र दिल्ली दौरा रद्द झाल्याचे समोर आले आहे.