मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकारली आहे. राजभवन येथे त्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता. हा शपथविधी तुलनेने लवकर पार पडल्याने त्यावर टीका झाली असली तरी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करत सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती दिली आहे. अर्थ खात्याचा अपवाद वगळता अजित पवार यांच्याकडे असलेली इतर सर्व खातीही आता सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे. सुनेत्रा पवार येत्या ९ फेब्रुवारीपासून मंत्रालयातील कामकाजाला सुरुवात करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यातही शोक म्हणून बंद पाळण्यात आला होता. बारामतीचे सुपुत्र असलेल्या अजित पवार यांच्याबद्दल नागरिकांनी आपुलकी व्यक्त केली होती, तर बीड जिल्ह्यातील जनतेनेही त्यांच्या कामगिरीची दखल घेत श्रद्धांजली वाहिली होती.
दरम्यान, बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाची जबाबदारी पूर्वी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली होती. आता ती जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे अधिकृतपणे सोपवण्यात आली आहे.