पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. स्थानिक सरपंचांच्या दाव्यानुसार, विमान कोसळताना त्यातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, असे त्यांनी सांगितले.
मिटकरी यांनी सांगितले की, अपघाताच्या दिवशी अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर ते घटनास्थळी गेले होते. तेव्हा गावातील सरपंचांनी त्यांना सांगितले की, विमान खाली येत असताना त्यातील एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. स्थानिक लोक त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धावत गेले, मात्र त्याचवेळी मोठा स्फोट झाला.
यासोबतच मिटकरी यांनी मृतांची संख्या संदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. “डीजीसीएने सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, मात्र घटनास्थळी केवळ पाच मृतदेह सापडले. मग सहावा प्रवासी कुठे गेला?” असा सवाल त्यांनी केला आहे. या बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरपंचांचा प्रत्यक्षदर्शी दावा
गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनीही या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातावेळी विमानाचा दरवाजा उघडा होता. निळी पँट घातलेली व्यक्ती बाहेर येत असल्याचे त्यांना भासले, मात्र क्षणात सर्व काही बदलले.तसेच, हे विमान अजित पवारांचे असल्याची त्यांना कल्पना नव्हती; ते एखाद्या उद्योगपतीचे असावे असे वाटले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आटोळे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना सर्व घटना तपशीलवार सांगितली आहे. त्यांच्या माहितीनुसार, विमानाने आधी दोन वेळा आकाशात गोल फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर खाली कोसळले.
चौकशी सुरू
या अपघातावर विविध स्तरांतून शंका व्यक्त होत असून, प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातामागील नेमके कारण काय होते, याबाबतचा अहवाल लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.