पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम आहे. केमिकल वाहतूक करणारा टँकर उलटल्याने महामार्गावर गळती झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे आणि बोरीवली या मार्गावरील सर्व एसटी बसेस पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत बससेवा सुरू करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील १३९ बसफेऱ्या रद्द
टँकर अपघातामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७३ ई-शिवनेरी आणि ६६ इतर एसटी बसफेऱ्यांचा समावेश आहे.तसेच या महामार्गावर एसटीच्या १६३ बसेस अडकून पडल्या होत्या. यात सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे आणि मुंबई विभागातील बसेसचा समावेश होता. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले असून, वाहतूक सुरळीत होताच टप्प्याटप्प्याने बससेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवाशांचे प्रचंड हाल
महामार्गावरील कोंडीचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत आहे. अनेक प्रवासी बसस्थानकांवर तीन ते चार तासांहून अधिक वेळ अडकून पडले आहेत. नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.अचानक बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहन, ट्रेन किंवा इतर पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. वाहतूक कधी सुरळीत होणार आणि शिवनेरी सेवा कधी पूर्ववत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.