पुणे : घरगुती भांडणाच्या रागातून पतीने पत्नीच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच, घटनास्थळावरील रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पतीसह त्याच्या दोन नातेवाईकांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव वैष्णवी तुषार तुपसुंदर (वय २३) असे असून तिचा पती तुषार उर्फ गणेश विलास तुपसुंदर (वय २८, रा. भवानी पेठ, हरकरनगर) याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच, पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी मनोज रोहिदास कांबळे (वय ३९) आणि त्यांची पत्नी वनिता मनोज कांबळे (वय ३२) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वैष्णवी आणि तुषार यांच्यात लग्नानंतर सातत्याने कौटुंबिक कारणांवरून वाद होत होते. दोन दिवसांपूर्वी हे भांडण टोकाला गेले. रागाच्या भरात तुषारने घरातील जड वस्तूने वैष्णवीच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर तिला चक्कर येऊन ती पडली असे सांगत शेजाऱ्यांच्या मदतीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी रक्ताचे डाग पुसल्याचे आढळून आले. मनोज कांबळे हा घराबाहेर पहारा देत होता, तर वनिता कांबळे हिने फरशीवरील रक्त साफ केल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अहवालानुसार वैष्णवीच्या डोक्यावरील जखमा अपघाती पडण्यामुळे होऊ शकत नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हा प्रकार खून असल्याचे निश्चित केले असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.