सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

शरीर सुदृढ असेल तरच उत्तम प्रशासन घडेल – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

डिजिटल पुणे    07-02-2026 18:06:22

​शिर्डी : खेळ आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे देतो. खेळामुळे आपण पराभव पचवायला व विजयात नम्रता बाळगायला शिकतो. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते. मनातील अहंकार गळून पडतो. आपल्या प्रशासकीय कामकाजात व वैयक्तिक आयुष्यातही या गुणांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपुरते न खेळता, व्यायामाचा हा मंत्र आयुष्यभर जपा. यातूनच चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता व पर्यायाने एक उत्तम प्रशासन घडेल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) गिरीश महाजन यांनी केले.

​गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी – शिर्डी (ता. राहाता) येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या ‘पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जलसंपदा मंत्री ​श्री. महाजन म्हणाले, मी स्वतः शालेय जीवनापासून खेळाशी जोडलेलो आहे. एक खेळाडू म्हणून मला खेळाचे महत्त्व जवळून माहित आहे. तुम्ही या स्पर्धेकडे नियमित व्यायाम व सराव म्हणून पाहिले पाहिजे. जीवनात शारीरिक तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायाम ही आपली रोजची गरज बनली पाहिजे. जेव्हा आपली शरीरयष्टी चांगली असते, तेव्हा मनही सुदृढ राहते. सुदृढ मनामुळे कामात एकाग्रता वाढते, चिडचिड होत नाही व कामाचा अतिरिक्त ताण जाणवत नाही.

आजच्या धावपळीच्या युगात कामाचे ओझे निश्चितच जास्त आहे, पण त्यावर मात करण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा-पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ काढा. धावणे, चालणे किंवा योगासने करा. अनेकदा तणाव आला म्हणून लोक व्यसनाचा आधार घेतात, परंतु तणाव कमी करण्यासाठी व्यसनाची मुळीच गरज नसते. जर तुमची तब्येत चांगली असेल, तर मनस्थिती आपोआपच चांगली राहते. तुमच्या मनगटात ताकद असेल, तर मनात आपोआप धाडस निर्माण होते. हे केवळ नियमित व्यायाम व सुदृढ शरीरामुळेच साध्य होऊ शकते, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

​पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, सहकाराचा वारसा लाभलेली ही भूमी आता क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करत आहे. ज्याप्रमाणे सहकारातून विकासाची दिशा मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त व सांघिक भावना रुजविण्याचे आमचे ध्येय आहे. अहिल्यानगरच्या मातीत सेवाभाव व खेळाडूवृत्तीचा अनोखा संगम साधला गेला असून, स्पर्धेतील जय-पराजयापेक्षा येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा व प्रशासकीय मैत्रीबंध अधिक घट्ट करणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

​अपर मुख्य सचिव श्री. कपूर म्हणाले, स्पर्धेत केवळ सहभाग महत्त्वाचा नसून जिंकण्याच्या जिद्दीनेच खेळा. क्रीडांगणात उतरल्यावर विजय मिळवण्याच्या उद्देशानेच खेळले पाहिजे. मंत्रालयातील दैनंदिन कामातून वेळ काढत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सरावाचे त्यांनी विशेष कौतुक केले.​याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा स्पर्धेसाठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमात अर्जुन पुरस्कारार्थी भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी खो-खो खेळाडू कु. श्वेता गवळी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

​यावेळी व्यासपीठावर सचिव (लाभक्षेत्र विकास) संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिमनवार यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून व शानदार पथसंचलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धेचा शुभंकर असलेल्या ‘जलवीर’ व‌ विजेता चषकाचे अनावरणही करण्यात आले. उपस्थित मान्यवर व खेळाडूंनी क्रीडा विकासाची शपथ घेतली. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘क्लॅपर’ वाजवून १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला.

​लोणी -शिर्डी येथे रंगणार तीन दिवस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जलसंपदा विभागाच्या या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी व शिर्डी येथे पार पडणार आहेत. जलसंपदा विभागात २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून या उपक्रमाची सुरुवात झाली होती. त्यानंतर सातारा (२०१८), जळगाव (२०२०) आणि नागपूर (२०२५) नंतरचे हे पाचवे पर्व लोणी-शिर्डी (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आले आहे.

​या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, ॲथलेटिक्स, कॅरम, जलतरण, टेबल टेनिस, बुद्धिबळ व बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. यासाठी मंत्रालय स्तर, विविध महामंडळे तसेच क्षेत्रीय आस्थापनांमधील संघ व खेळाडू उपस्थित राहिले आहेत. विभागीय, मंडळ व महामंडळ स्तरावर पारदर्शक निवड प्रक्रिया राबवून अंतिम फेरीसाठी ११ विभागांतील संघांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात एकूण ९ क्रीडा प्रकार व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून, यात ४८० महिला व ९७० पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे या महोत्सवाचा समारोप होईल.सिंचन व व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील ताण-तणाव कमी करून त्यांच्यात संघभावना, शिस्त व कार्यक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेचे घोषवाक्य ‘खेळात सशक्त तर सेवेत समर्थ’ असे आहे.


 Give Feedback



 जाहिराती