उरण : समुद्राच्या तुफान लाटांशी झुंजणारा कोळी बांधव आपली संस्कृती जपणारा समाज आहे. त्यामुळे कोळी समाजाचा मला नितांत आदर आहे. भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना सिडकोचे साडेबारा टक्के भूखंड मिळाले पाहिजेत, ही लोकनेते दिबा साहेबांची भूमिका होती, पण त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने आजही झालेली नाही, हे दुर्दैव आहे. मैदाने नसतील तर येणारी पिढी खेळणार कुठे, त्यामुळे मैदानांसाठी सर्वांनीच पुढे या, आपण भूमिपुत्र आहोत, आपला पहिला हक्क आहे. लढल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे मी आपल्यासोबत आहे. गावातील तरुणांनी पुढे यावे, घरे बांधावीत, गरजेनुसार घरांची गरज आपल्यालाही आहे. सत्ताधाऱ्यांना मूलभूत सुविधांचा विसर पडलेला आहे, असे महेंद्रशेठ घरत उरण येथील कुंडेगाव येथे म्हणाले.
श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा यांनी कॉंग्रेस चषक आयोजित केला होता. त्यावेळी महेंद्रशेठ बोलत होते.त्यावेळी ते क्रिकेटपटूंशी संवाद साधताना म्हणाले, "परप्रांतीय येतील, झोपड्या बांधतील, सरकार त्यांना फुकटात घरे देईल, असेच सध्या सुरू आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनो, सावध व्हा आणि वाढत्या गरजेनुसार घरे बांधा. कुंडेगावातील तरुणांनी पहिल्यांदाच प्रकाशझोतातील क्रिकेट सामने ठेवले, उत्तम आयोजन केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन." पालघर-वाडा येथे राज्यस्तरीय ब्रास बँड स्पर्धेत कुंडेगाव येथील जय हनुमान कला सर्कल ब्रास बँड पथकाला द्वितीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचे ब्रास बॅंडने स्वागत केले आणि यथोचित सन्मान केला.यावेळी केडीएच स्पोर्टस वाघिवली वाडा संघ विजेता ठरला; तर सुरुंग पाडा, फुंडे, पागोटे या संघानीही द्वितीय, तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळविली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, सरपंच सविता मढवी, भजन गायक लक्ष्मण पाटील, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील, अंगद ठाकूर, भालचंद्र चोगले, चंद्रकांत ठाकूर, राजेश ठाकूर, कल्पेश पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.