पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक कात्रज तलाव परिसर मंगळवारी सकाळी सामाजिक जाणीवेच्या ऊर्जेने उजळून निघाला. भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित एकदिवसीय ऐतिहासिक स्थळ संवर्धन उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वारसा जतन आणि स्वच्छतेची जाणीव दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.स्वयंसेवकांनी परिसरातील प्लास्टिक व घनकचरा गोळा करत स्वच्छता मोहीम राबवली. उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता ऐतिहासिक स्थळांचे जतन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी जनजागृती करण्यात आली. “आपला वारसा, आपली जबाबदारी” हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.
“इतिहासाचा वारसा जपणे आणि पर्यावरण संवर्धन करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक सजग नागरिकाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी केले.उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे आणि उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी विद्यार्थिनींना सामाजिक सहभागाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हा समन्वयक डॉ. सविता इटकरकर यांची उपस्थिती उपक्रमाला प्रेरणादायी ठरली. कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता जाधव आणि प्रा. सीमा हाडके यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदविला.
या उपक्रमात भारती विद्यापीठ फाईन आर्ट्स महाविद्यालय, सौ. काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव तसेच सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक जबाबदारीची भावना कृतीतून व्यक्त केली.
स्वच्छता मोहिमेनंतर महाविद्यालयात पोस्टर निर्मिती आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मांडणी केली. या सर्जनशील उपक्रमामुळे संवर्धनाची भावना केवळ कृतीत नव्हे तर विचारांतही रुजली.उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला, मात्र या उपक्रमातून जागवलेली जाणीव आणि प्रेरणा समाजमनात दीर्घकाळ टिकून राहील, याची खात्री व्यक्त करण्यात आली.