बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा गंभीर आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात सीआयडीला माहिती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृष्णा आंधळे मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याला पकडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्याची गरज असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. तसेच कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
आज बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. गेल्या दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आरोपी वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर 26 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडणार असल्याचे देशमुख कुटुंबाने सांगितले.
सुनावणीत काय घडले?
आजच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्याच्या मागणीवर सरकारी पक्ष लेखी उत्तर सादर करणार आहे. विष्णू चाटे यांच्या जेल बदली अर्जावर आदेश येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आरोपी जयराम चाटे यांनी नवीन वकील एम. के. वाघीरकर यांची नियुक्ती केली आहे.
आरोपींच्या वकिलांकडून लॅपटॉपची क्लोन कॉपी, फॉरेन्सिक अहवाल आणि पेन ड्राईव्ह अद्याप न मिळाल्याची बाब न्यायालयात मांडण्यात आली. या कागदपत्रांशिवाय साक्षीदारांची यादी स्वीकारू नये, अशी मागणी बचाव पक्षाने केली. सरकारी पक्षाने दोषारोपपत्र पूर्ण स्वरूपात एकदाच दाखल करावे, अशीही विनंती करण्यात आली.या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.