पुणे/हिंगोली : अमेरिकेनं इराणवर हल्लाबोल केल्यानंतर जागतिक स्तरावर या युद्धजन्य परस्थितीचे परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यातच, आखाती देशांमध्ये हवाई वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आलंय. येथील युद्धसंघर्षाचा परिणाम दुबईवरही झाल्याने दुबई विमानतळावरुन उड्डाण घेणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे, अनेक भारतीय नागरिक, प्रवासी दुबईत अकडून पडले आहेत.मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा फटका आता भारतीय प्रवाशांनाही बसू लागला आहे. अमेरिकेने इराणवर कारवाई केल्यानंतर आखाती देशांतील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे दुबई विमानतळावरून भारतात परतणारे अनेक प्रवासी अडकले आहेत. त्यामध्ये पुण्यातील एका कॉलेजच्या 80 एमबीए विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पुण्यातील व्यवस्थापन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दुबईला गेली होती. या सहलीत एकूण 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. नियोजित कार्यक्रमानुसार हे विद्यार्थी 1 मार्च रोजी भारतात परतणार होते. मात्र, अचानक उड्डाणे रद्द झाल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास रखडला आहे.
विद्यार्थी सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळत असली तरी त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील खुशी बढेरा ही विद्यार्थिनी देखील या गटात असून तिच्या वडिलांनी केंद्र सरकारने विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उत्कर्ष मपारा हाही दुबईमध्ये शिक्षणासाठी गेला असून तो सध्या सुरक्षित असल्याची माहिती त्याचे वडील राजेश मपारा यांनी दिली. ग्लोबल एमबीएच्या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी तो 18 फेब्रुवारी रोजी दुबईत दाखल झाला होता. तो स्वतंत्र राहात असून कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात आहे.
मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे परदेशात शिक्षण किंवा सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.