अहमदाबाद : भारताने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार एमएस धोनी आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकगौतम गंभीर यांच्यात सोशल मीडियावर झालेला हलकाफुलका संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत पाच बाद 255 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 159 धावांवर संपुष्टात आला. या दणदणीत विजयामुळे भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या विजयानंतर जवळपास दोन वर्षांनंतर एमएस धोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, अहमदाबादमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील भारतीय चाहत्यांचे मनापासून अभिनंदन. संघाला खेळताना पाहणे हा आनंददायी अनुभव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल बोलताना धोनी म्हणाले, “कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित खूप छान दिसतं. त्या स्मितामागची तीव्रता आणि जिद्द हे उत्तम संयोजन आहे. हा क्षण मनापासून एन्जॉय करा.” तसेच त्यांनी गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही विशेष उल्लेख करत त्याला “खरा चॅम्पियन गोलंदाज” म्हटले.धोनीच्या या पोस्टला गौतम गंभीर यांनीही तत्काळ उत्तर दिले. “हसण्याचं इतकं सुंदर कारण आहे… आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला,” असे त्यांनी लिहित धोनीला प्रतिसाद दिला.
भारताची दमदार फलंदाजी
भारतीय डावात सलामीवीर संजू सॅमसन याने 46 चेंडूत 89 धावांची स्फोटक खेळी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. त्याने अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्यासह मोठ्या भागीदाऱ्या केल्या. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 धावा, तर ईशान किशनने 25 चेंडूत 54 धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी आक्रमक फटकेबाजी करत भारताचा स्कोअर 255 धावांपर्यंत पोहोचवला.
न्यूझीलंडचा डाव कोसळला
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. सेफ्टरने याने सर्वाधिक 52 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनर याने 43 धावांची झुंज दिली. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने संपूर्ण संघ 159 धावांत बाद झाला.भारतीय गोलंदाजीत जसप्रीत बुमराह याने चार विकेट घेत निर्णायक भूमिका बजावली. त्याला अक्षर पटेल याची तीन विकेट्सची साथ मिळाली आणि भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला.