नवी दिल्ली: बारामती येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार सध्या दिल्लीत विविध नेत्यांची भेट घेत आहेत. याच दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीं यांची भेट घेतली. या भेटीत बारामतीतील विमान दुर्घटना, त्यासंदर्भातील तपासाची दिशा तसेच प्रशासनाची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली.
भेटीनंतर रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (DGCA) कलम 12 अंतर्गत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. ही चौकशी समिती पारदर्शक पद्धतीने कार्य करावी आणि त्यात राहुल गांधींचे नेतृत्व असावे, अशी मागणीही त्यांनी मांडली आहे.दरम्यान, राहुल गांधी यांनीही या घटनेबाबत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी या विषयावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्याकडून मिळालेल्या निवेदनाचा उल्लेख केला आहे.
सीबीआय चौकशीबाबत प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात अजूनही महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय तपास ब्युरो (CBI) कडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती नाही. त्यांनी तुलना करत सांगितले की, अभिनेता सुशांत सिंघ राजपूत प्रकरणात बिहार सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीबीआयने तपास सुरू केला होता. मात्र बारामती दुर्घटनेबाबत अद्याप राज्य सरकारकडून अशी कोणतीही प्रक्रिया झालेली नाही.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांनी CBI, DGCA तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही भेटीची वेळ मागितली आहे. मात्र विरोधी पक्षातील आमदार असल्यामुळे वेळ मिळत नसावा, असे त्यांनी म्हटले.
प्रफुल्ल पटेलांवर निशाणा
दरम्यान, रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यावरही टीका केली. अजित पवारांकडे शेवटी असलेली एक फाईल ही प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित असल्याचे ते स्वतः म्हणाले होते, असा दावा त्यांनी केला.तसेच जय पवार यांच्यावर पत्रकार परिषद घेऊ नये असा दबाव टाकण्यात आल्याची माहिती मिळाल्याचेही रोहित पवार यांनी सूचित केले. हा दबाव नेमका कोणी टाकला याबाबत मात्र स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींची प्रतिक्रिया
या भेटीनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, रोहित पवार यांनी बारामती विमान दुर्घटना आणि अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीबाबत गंभीर मुद्दे मांडले आहेत. इतकी मोठी घटना घडूनही अद्याप एफआयआर नोंदवलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रकरणात कायद्याचे मूलभूत नियम पाळले गेले आहेत का याबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी केली.