पुणे :कात्रज परिसरात नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान दिवसभरात एकूण २४८ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने प्रवाशांकडून भाडे नाकारणे आणि जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचा समावेश आहे.
वाहतूक पोलिसांनी कात्रज बोगदा, कात्रज नाका, भारती विद्यापीठ परिसर आणि राजीव गांधी सर्प उद्यान या भागांत नाकाबंदी करून तपासणी केली. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
या कारवाईत भाडे नाकारण्याच्या ११६ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून सर्व प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आला आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या १११ रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली.याशिवाय गणवेश न घालता वाहन चालवणाऱ्या ११ चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच सिग्नल तोडणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
कात्रज नाका व बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या भाडे नाकारणे व इतर त्रासाच्या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त होते. त्यामुळे वाहतूक विभागाने ही मोहीम राबवली असून पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहतील, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी दिली.