बांगलादेश : पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून अनेक देशांपुढे इंधन टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर भारताने शेजारी देश बांगलादेशला मदतीचा हात देत मोठा दिलासा दिला आहे. बांगलादेशला अतिरिक्त 40 हजार टन डिझेल पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतून होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळे येत आहेत. या परिस्थितीत इंधन साठा स्थिर ठेवण्यासाठी बांगलादेशने भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केली होती.
बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, अलीकडेच भारतातून सुमारे 5 हजार टन डिझेल बांगलादेशात पोहोचले आहे. याशिवाय 18 किंवा 19 मार्चच्या सुमारास आणखी 5 हजार टन डिझेल मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारताकडून अतिरिक्त 40 हजार टन डिझेल आयातीचा प्रस्तावही पुढे आला असून आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हा साठा एप्रिलपर्यंत बांगलादेशात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि बांगलादेश दरम्यान डिझेलची वाहतूक बांगलादेश-भारत मैत्री पाइपलाइनमार्फत केली जाते. ही पाइपलाइन भारतातील नुमालीगड रिफायनरीला उत्तर बांगलादेशातील पार्वतीपूर इंधन डेपोशी जोडते. सीमापार ऊर्जा व्यापार सुलभ करण्यासाठी आणि बांगलादेशला स्थिर इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मार्च 2023 मध्ये या पाइपलाइनचे उद्घाटन करण्यात आले होते.
या पाइपलाइनच्या सुरूवातीपूर्वी भारतातून डिझेलची वाहतूक मुख्यतः रेल्वे वॅगनद्वारे होत होती. मात्र ती प्रक्रिया वेळखाऊ आणि लॉजिस्टिकदृष्ट्या अधिक गुंतागुंतीची होती. काही काळ पाइपलाइनद्वारे होणारी आयात थांबवण्यात आली होती, परंतु नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर हा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाल्याने बांगलादेशात काही काळ पेट्रोल-डिझेल विक्रीवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रवास वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. अतिरिक्त डिझेल आयात झाल्यानंतर देशातील इंधन पुरवठा स्थिर राहील आणि सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.