पुणे: महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठी दुभंगलेली परिस्थिती पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागात उष्णतेची तीव्रता वाढत असताना, दुसऱ्या बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा दिला आहे.
विदर्भात वादळी पावसाची शक्यता
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हवामान अचानक बदलण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया आणि अमरावती परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि ठिकठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. बुलढाणा, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा या भागात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू शकतो. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम येथेही काही ठिकाणी विजांसह सरी पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा इशारा कायम आहे.
उत्तर महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा
जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ५० ते ६० किमी प्रतितास राहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी
सोलापूर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.
कोकणात उष्णतेचा तडाखा वाढणार
दरम्यान, कोकण किनारपट्टीवर मात्र वेगळीच स्थिती आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होऊन उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला
दुपारनंतर हवामान बदलण्याचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे झाडाखाली किंवा असुरक्षित शेडमध्ये उभे राहणे टाळावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.