सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला असून, मृत व्यक्तींनाही सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यानंतर रुग्णालयात झालेल्या गोंधळामुळे दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे चुकीच्या पद्धतीने सुपूर्द झाल्याचे उघड झाले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाली. यातील एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि संबंधित कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मृतदेह देताना चेहरा दाखवण्यास नकार देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. चुकीचा मृतदेह दिल्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असून, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे सांगितले आहे. तसेच, प्रक्रियेनुसार मृतदेह हस्तांतरण करताना नातेवाईकांच्या सह्या घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.या धक्कादायक प्रकारामुळे सातारा जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.