नागपूर : राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. आरोग्य सुविधा गावपातळीपर्यंत भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठीच्या मोलाच्या योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहोचणे आवश्यक असून या योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची चळवळ पुढे आले पाहिजे. आरोग्य यंत्रणा तसेच लोकसहभागातून अधिक सशक्त व निरोगी महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स येथील सभागृहात आयोजित ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव-२ ई. रविंद्रन, आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कांदेवाड आदी उपस्थित होते.
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामूहिक वर्तणुकीत बदल घडविणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यावर या मोहिमेत भर देण्यात आल्यामुळे लोकसहभागाच्या माध्यमातून आरोग्य संपन्न गाव करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे व या ठिकाणी कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकन प्रणालीच्या आधारे, या अभियानातून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे, आरोग्य समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासोबतच हे अभियान यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.
वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्याविषयक उपक्रम राबविणे गरजेचे होते. या अनुषंगाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षणात आरोग्याचा धडा देणे गरजेचे आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून काम केले पाहिजे. सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा काहीही मोठे नाही. स्वच्छता महत्वाची असून प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून काम केले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाविषयी माहिती दिली. नागपूर तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे विनायक महामुनी तसेच मुरुंगनाथम एम. यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान गीताचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यशाळेत नागपूर व अमरावती विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरपंच, सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यान्वयीन यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.