नांदेड : नांदेड शहरात मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भीषण संघर्षात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डी-मार्टजवळील ई-स्क्वेअर परिसरात ही घटना घडली. जुन्या वैमनस्यातून सुरू झालेल्या वादाने अचानक हिंसक वळण घेतले.
या प्रकरणात अरिजितसिंग चव्हाण (वय 25) यांच्यावर काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील आणि मोहंमद अरबाज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, यानंतर घटनाक्रम अधिक गंभीर झाला. अरिजितसिंगचा भाऊ रुग्णालयात पोहोचून जखमी अवस्थेत असलेल्या आवेज आणि अरबाज यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही टोळ्यांचा गुन्हेगारी इतिहास असून यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. काही आरोपींवर हद्दपारीसारखे कठोर निर्णयही घेण्यात आले होते. सध्या या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून, भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.ही घटना शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.