पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. भांबर्डे गावात एका आईने स्वतःच्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याची क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने आपल्या लहानग्या मुलाला सिमेंटच्या ओट्यावर आपटून ठार मारले. इतक्यावरच न थांबता, तिने गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत मुलाचा मृतदेह एका बॅगेत टाकला आणि त्यात दगड भरून जवळच्या विहिरीत फेकून दिला.
दिनांक 08 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता भांबर्डे गावातील शेतातील विहिरीत ११ महिन्यांचा कु. यश रवींद्र पवार याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवली गेली होती.मात्र, पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.आणि प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.
तपासादरम्यान आरोपी आई सौ. पूजा रवींद्र पवार हिने गुन्ह्याची कबुली दिली. कोकणातील मुरुड येथून फिरून आल्यानंतर मुलगा सतत रडत असल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती.तिने दुसरे लग्न करण्याच्या उद्देशाने मुलाला अडथळा मानून, त्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून खून केल्याचे उघड झाले आहे.यानंतर तिने पुरावा नष्ट करण्यासाठी रक्त धुऊन काढले आणि मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरून शेतातील विहिरीत टाकला. बॅग पाण्यात बुडून राहावी म्हणून त्यात दगड भरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या जलद आणि कुशल कारवाईमुळे अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले. संशयित आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराची सर्वत्र तीव्र निंदा होत आहे.
देशभरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची बाब चिंताजनक आहे. च्या अहवालानुसार कौटुंबिक हिंसाचार आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.यामुळे समाजात सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेतया घटनेमुळे शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. निष्पाप बालकाच्या हत्येने मानवी संवेदनांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना केवळ गुन्हा नसून, समाजातील मानसिक आणि सामाजिक समस्यांचेही गंभीर चित्र दाखवते.