मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचा महाराष्ट्रात उतार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. या विधानावर आता त्यांच्या भावाकडून, आमदार रोहित पवार यांनीच संयत पण स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, सत्तेत असो किंवा विरोधात, राजकारणात काम करताना जमिनीशी नातं टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पार्थ यांनी केलेलं विधान घाईगडबडीत झालं असून ते योग्य नव्हतं, असे त्यांनी नमूद केले. कोणताही राजकीय पक्ष पूर्णपणे संपत नाही, प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर ताकद लावत असतो, त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल बोलताना संयम बाळगणं गरजेचं असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, आज पार्थ यांना विचारले तर ते स्वतःही त्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ लावला गेला असल्याचे सांगू शकतात. मात्र, ते वक्तव्य घाईत केलेलं असल्याचं स्पष्ट दिसतं. तरीदेखील, पक्षातील वरिष्ठ नेते आणि काँग्रेस यांच्यात संवाद होऊन यावर काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या प्रकरणावर सूचक प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्मितहास्य करत, राजकारणात महत्त्वाच्या विषयांवर बोलताना परिपक्वता आवश्यक असल्याचे सांगितले. ती कितपत आहे, हे सध्या सांगणं कठीण असल्याचा टोला त्यांनी लगावला.
तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून दिली. देशाच्या घडणीत काँग्रेसची भूमिका मोठी राहिली असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनीही पार्थ यांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.या सर्व घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणुकीत राजकीय रंग अधिकच चढताना दिसत आहे.