बारामती: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असून सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी काटेवाडी येथून ‘घोंगडी सभा’ या पारंपरिक पद्धतीने प्रचाराला सुरुवात करत गावागावात संपर्क साधण्यावर भर दिला आहे.
या सभेला त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि बहीण सई पवारही उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी भावनिक सूर लावत अजित पवार यांच्याशी असलेले नाते आणि आठवणी जागवल्या. “मी लहानपणी दादांच्या प्रचारासाठी सायकल रॅली काढली होती. आज मी वेगळ्या पक्षात असलो तरी दादांबद्दलचा आदर कायम आहे,” असे ते म्हणाले.
अपक्ष उमेदवारांवर टीका
या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी उमेदवार न दिल्याचा उल्लेख करत त्यांनी अपक्ष उमेदवारांवर निशाणा साधला. “ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले, मात्र अपक्षांनी उभं राहू नये होतं. गावोगावी त्यांना मत मिळू नये यासाठी प्रयत्न करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
‘दादांची आठवण कायम’
प्रचारादरम्यान अनेकांनी अजित पवारांच्या आठवणी सांगितल्याचे नमूद करत रोहित पवार म्हणाले, “आजही काही अधिकारी सांगतात की दादांचा फोन येईल असं वाटतं. बारामतीकरांच्या मनात त्यांचं स्थान कायम आहे.”
मतदारांना आदेश नाही, विनंती
बारामतीच्या मतदारांवर विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “इथल्या लोकांना काय करायचं हे चांगलं माहित आहे. त्यांना आदेश देता येत नाहीत, फक्त विनंती करता येते.”
परिवारातील एकजूट आणि राजकारण
शरद पवार यांच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले होते. तसेच सुप्रिया सुळे यांच्यासह इतरांनीही चर्चा केल्यामुळे काही पक्षांनी माघार घेतली.
एकत्र प्रचाराबाबत स्पष्टता नाही
जय पवार यांच्यासोबत एकत्र प्रचार करणार का, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, “सर्वजण आपापल्या स्तरावर प्रचार करत आहेत. वेगवेगळ्या भागात काम केल्याने व्याप्ती वाढते.”सांगता सभेत एकाच मंचावर दिसणार का, यावर त्यांनी स्पष्ट उत्तर टाळत म्हटले, “तो त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता. आमच्यात संवाद झाला नव्हता. मात्र प्रचारात सहभाग घेतलाच हे महत्त्वाचं आहे.”
‘९९ टक्के मतदान सुनेत्रा पवारांना’
मताधिक्याबाबत आत्मविश्वास व्यक्त करत त्यांनी दावा केला की, “जास्तीत जास्त मतदान सुनेत्रा काकींनाच मिळेल. बाहेरून आलेल्या उमेदवारांना शून्य मतं मिळाली तरी आश्चर्य वाटू नये.”बारामतीत भावनिक आणि कुटुंबीय समीकरणांवर आधारित हा प्रचार रंगत असून, येत्या मतदानात त्याचा परिणाम काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे