पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या तपासाबाबत राज्य सरकारला स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. १० मेपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही तर सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनीही तपासातील विलंबावर नाराजी व्यक्त केली आहे. “सरकार या प्रकरणात दिरंगाई का करत आहे, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे,” असे ते म्हणाले. खरात प्रकरणात ज्या वेगाने तपास झाला, त्याच पद्धतीने या घटनेचा तपास का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मिटकरी यांनी पुढे सांगितले की, इतक्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतर साधा एफआयआरही दाखल होत नसल्याने अनेक शंका निर्माण होत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
याशिवाय, बारामतीतील राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी नमूद केले की, अजित पवार जिवंत असताना त्यांनी भाजप नेत्यांना बारामतीत हस्तक्षेप करू दिला नव्हता. मात्र आता महायुतीचे नेते प्रचारात सक्रिय दिसत असून, येणाऱ्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अपघाताचा तपास आणि त्यातील विलंब हा राज्यातील राजकारणात मोठा मुद्दा बनण्याची चिन्हे दिसत आहेत.