मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉड्युल, इन्गॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम-आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस-टू-केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.यामध्ये नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. 800 कोटींची गुंतवणूक करून 500 जणांना रोजगार देणार आहे. अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि. 1,000 कोटींची गुंतवणूक करत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. 1,000 कोटींची गुंतवणूक करून 1,000 नवीन रोजगार निर्माण करेल. पुण्याच्या शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. 1,500 कोटींच्या गुंतवणुकीतून 3,000 लोकांना संधी देणार आहे.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. 3,135 कोटींची गुंतवणूक करून 8,000 जणांना रोजगार देणार आहे. अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस 4,000 कोटींच्या गुंतवणुकीसह 1,000 रोजगार निर्माण करेल.
पुण्याच्या तळेगाव भागात युरोबस इंडिया प्रा. लि. 4,200 कोटींची गुंतवणूक करून 12,000 रोजगार निर्माण करेल. चंद्रपूरमध्ये मिलीयन स्टील प्रा. लि. 256.01 कोटींच्या गुंतवणुकीतून 360 रोजगार निर्माण होणार आहेत.
भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँड लि. 10,000 कोटींची मोठी गुंतवणूक करून 1,000 रोजगार उपलब्ध करून देईल. नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा. लि. 11,400 कोटींची गुंतवणूक करून 7,000 रोजगार निर्माण करेल. तसेच याच कंपनीचा रायगड/पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्प 11,000 कोटींची गुंतवणूक करून 2,500 रोजगार निर्माण करेल.
नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. 12,780 कोटींच्या गुंतवणुकीतून 6,825 जणांना रोजगार देणार आहे. ग्लोब फोर्ज लिमिटेड, अहिल्यानगर व धाराशिव येथे 15,430 कोटींची गुंतवणूक करून 3,600 रोजगार निर्माण करेल.
रायगड येथे बालासोर अलॉयज 17,479 कोटींची गुंतवणूक करून 3,200 रोजगार निर्माण करेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यू एनर्जी प्रा. लि. 27,515 कोटींची गुंतवणूक करून 4,000 रोजगार निर्माण करेल.रायगड/पालघरमध्ये अॅकमे क्लीनटेक प्रा. लि.चा ग्रीन अमोनिया प्रकल्प 37,800 कोटींची गुंतवणूक करून 4,500 रोजगार निर्माण करेल. गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. 40,000 कोटींची भव्य गुंतवणूक करून 20,000 रोजगार निर्माण करेल.
सर्वात मोठी गुंतवणूक एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये 56,852 कोटींच्या रूपात होणार असून, त्यातून 25,000 जणांना रोजगार मिळणार आहे.या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होईल.