बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. या वेळी रोहित पवार यांनी कुटुंबासह मतदान करून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन केले.
विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजितदादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता होती. “दादा असते तर 2029 मध्ये ते मुख्यमंत्री होण्याची पूर्ण शक्यता होती,” असा दावा त्यांनी केला. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत आता विलीनीकरणाचा विषय पुढे येण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दादांच्या निधनानंतर त्यांच्या प्रती आदर आणि भावनिक नात्यामुळेच आपण प्रचारात सहभागी झालो, असे रोहित पवारांनी सांगितले. सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी उपस्थित राहणे हा पूर्णपणे भावनिक निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.
2029 च्या निवडणुकांबाबत त्यांनी सूचक विधान करत “पवार विरुद्ध पवार” अशी लढत पुन्हा पाहायला मिळू शकते, असे म्हटले. लोकांना अशी लढत नको असली तरी काही घटक त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजितदादांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ते स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम होते. “काम होणार असेल तर ‘हो’, नाहीतर सरळ ‘नाही’,” ही त्यांची शैली लोकांना भावायची. अधिवेशनातही ते सहकाऱ्यांच्या कामकाजापासून पेहरावापर्यंत बारकाईने लक्ष देत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली.
दरम्यान, मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे, असे आवाहन करत काही मतदारांची नावे दूरच्या मतदान केंद्रांवर गेली असली तरी कार्यकर्त्यांच्या मदतीने मतदान करावे, असेही त्यांनी सुचवले. व्यापारी संघटनांनी सकाळी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.तसेच, आपण बारामतीतून निवडणूक लढवणार नसून कर्जत-जामखेड मतदारसंघातच राहणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.