ठाणे : ठाणे स्टेशन परिसरात गुरुवारी शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे निघाली होती. मात्र स्टेशनजवळ येताच बस बंद पडली आणि इंजिन व डिझेल टाकीजवळून आग लागल्याचे लक्षात आले. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.या बसमध्ये सुमारे 15 प्रवासी होते. आग लागल्याचे समजताच सर्व प्रवाशांनी तत्परतेने बसमधून बाहेर पडत आपले प्राण वाचवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, एका महिला प्रवाशाची बॅग बसमध्येच अडकली होती. त्या बॅगेत साडेतीन तोळे सोन्याचे दागिने होते. बस पूर्णपणे जळून गेल्यानंतरही हे सोनं सुरक्षित अवस्थेत मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून संबंधित प्रवाशाला त्यांचे दागिने परत दिले.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी सर्वजण सुरक्षित असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सध्या सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर असल्याने प्रवासादरम्यान दागिने जवळ बाळगणे धोकादायक ठरत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.