दिल्ली : राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी सोडून भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या निर्णयामागची कारणं मांडली आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलं की, गेल्या काही दिवसांत अनेकांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल प्रश्न विचारले होते.
चड्ढा यांच्या मते, पक्षात पूर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाही. काम करण्यावर मर्यादा येत होत्या आणि संसदेतही मुक्तपणे मत मांडण्यास अडथळे येत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही लोकांच्या स्वार्थामुळे पक्षाची दिशा बदलल्याची टीकाही त्यांनी केली.
पक्ष सोडल्यानंतर स्वतःसमोर तीन पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं राजकारणातून बाहेर पडणं, त्याच पक्षात राहून बदल करण्याचा प्रयत्न करणं किंवा नव्या पक्षात जाऊन काम करणं. शेवटी सकारात्मक कामासाठी वेगळा मार्ग निवडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.चड्ढा यांनी असंही सांगितलं की, हा निर्णय एकट्याचा नसून सात खासदारांनी मिळून घेतलेला आहे. भविष्यातही जनतेचे प्रश्न संसदेत मांडत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.