सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 DIGITAL PUNE NEWS

सोनम वांगचुकांना रुग्णालयात हलवल्यानंतर शरद पवारांचा केंद्रावर निशाणा; 'आंदोलन दडपूनही थांबणार नाही'

डिजिटल पुणे    18-07-2026 12:26:47

नवी दिल्ली : 'नीट' पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करणारे पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी डॉक्टर आणि न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना, वांगचुक यांची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची असल्याचे सांगितले. शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

पवार म्हणाले की, विविध विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी गेले आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले. सरकारला आंदोलनाची तीव्रता लक्षात आल्यानंतरच वांगचुक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

"सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले म्हणून आंदोलन संपणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा लढा पुढेही सुरू राहील. वीस दिवस उपोषण सुरू असताना केंद्र सरकारमधील एकाही वरिष्ठ नेत्याने त्यांची भेट घेतली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या प्रश्नावर संसदेतही आवाज उठवला जाईल," असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतरही आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे 'नीट' पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती