पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाचा प्रस्ताव प्रलंबित होता. पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत आज हा प्रस्ताव चर्चेला आला. उरुळी देवाची येते असलेला भूमीग्रीन कंपनीचा कचरा प्रकल्प नूतनीकरणासाठी बंद करण्यात येत आहे. म्हणूनच पुढील ९ महिन्यांसाठी भूमीग्रीन कंपनीला सध्या उरुळी देवाची येथे अस्तित्वात असलेल्या कचरा डेपोच्या शेजारची जागा तात्पुरत्या स्वरूपात देण्याबाबत हा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. या प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. अखेरीस ९ विरुद्ध ४ असा हा प्रस्ताव मंजूर झाला.
याबाबत स्थायी समितीचे सदस्य व काँग्रेस पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. "मुळातच पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून भूमीग्रीन कंपनीला झुकते माप देण्यात येत आहे. या प्रकल्पाला सध्याच्या कचरा प्रकल्पासाठीही वाढीव दर देण्यात येत आहे. जुन्या प्रकल्पाचे नूतनीकरण होईपर्यंत नवीन तात्पुरत्या प्रकल्पासाठी भूमीग्रीन कंपनीकडून शेड उभारले जातील, नवीन मशिनरी घेतली जाईल आणि कालांतराने याच जागेत नवीन कचरा प्रकल्पाचे काम आपसुकच भूमीग्रीन कंपनीला दिले जाईल अशी आमची शंका नव्हे, तर खात्री आहे.
भूमीग्रीन कंपनीचा प्रकल्प नूतनीकरणासाठी जर काही महिने बंद राहणार असेल, तर भूमीग्रीन कंपनी सोडून सध्या पुणे महानगरपालिकेसोबत काम करणाऱ्या इतर कंपन्या वाढीव कचरा उचलण्यासाठी तयार आहेत, तशी मागणी करणारी पत्रेही अनेक कंपन्यांनी मनपा प्रशासनाला दिली आहेत. तरीही भूमीग्रीन कंपनीलाच पर्यायी जागा देण्याचे औदार्य महानगरपालिका प्रशासन का दाखवत आहे ? हा मुख्य प्रश्न आहे. एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.या प्रस्तावाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैशाली बनकर, अमोल बालवडकर, सुहास टिंगरे यांनी मतदान केले.