कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एका माजी सरपंच महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी होत असलेल्या वादातून आरोपीने महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक आरोप असून, मृतदेह कारमधून दुसरीकडे नेत असताना भिवंडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
मृत महिलेचे नाव सुरेखा शिवाजी न्यारे असे असून त्या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या प्रकरणी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०) याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सुरेखा न्यारे आणि आरोपी यांच्यात वैयक्तिक ओळख होती. दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. रविवारी (२६ जुलै) सकाळी शिरगाव परिसरातील एका म्हशीच्या गोठ्यात आरोपीने महिलेचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह स्वतःच्या कारमध्ये ठेवून भिवंडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्याने भिवंडी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले.या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून हत्या आणि त्यामागील नेमक्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.