नवी दिल्ली : लोकसभेत पेपरफुटी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बुधवारी सभागृहात मोठा गदारोळ झाला. "देशात तीन प्रकारचे लोक आहेत – विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त," असे म्हणत राहुल गांधी यांनी विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त यांची उपमा देत भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदारांनी तीव्र आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली.
राहुल गांधी यांनी भाषणात एका विद्यार्थिनीसोबत झालेल्या संवादाचा उल्लेख करत, "विद्यार्थी हा खुल्या मनाचा आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा असलेला असतो. मात्र मूर्ख व्यक्तीला सर्व काही माहिती असल्याचा अहंकार असतो, तर अंधभक्त अशा व्यक्तींना देवासारखे मानतात," असे म्हटले. या विधानावर सत्ताधारी बाकांवरून जोरदार विरोध झाला.
गोंधळ वाढल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी राहुल गांधींना विधेयकापुरतेच मर्यादित राहण्याच्या सूचना दिल्या. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी 'मूर्ख' आणि 'अंधभक्त' हे शब्द असंसदीय असल्याचा आक्षेप नोंदवला. त्यावर राहुल गांधी यांनी, "मी कोणत्याही खासदाराला थेट मूर्ख म्हटलेले नाही," असे स्पष्टीकरण दिले.
भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या घटनांवरून केंद्र सरकारवरही टीका केली. गरीब विद्यार्थी कठोर परिश्रम करूनही पेपरफुटीमुळे त्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असल्याचा दावा करत त्यांनी शिक्षणातील खासगीकरण आणि पेपरफुटीचा मुद्दाही उपस्थित केला.
याशिवाय, विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात सुरक्षा दलांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांनंतरही सभागृहात पुन्हा गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अध्यक्षांनी राहुल गांधींना संसदीय मर्यादांचे पालन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी राहुल गांधी यांनी "माझा माईक सुरू करा, मला बोलू द्या," अशी मागणी केल्याने लोकसभेतील वातावरण आणखी तापले.